महाराष्ट्र मंडळ डेन्मार्कचे मार्गदर्शक विकास पाठक ह्यांने लिहलेला वृत्त 'डेन्मार्कची कोरोनावर मात', e-sakal ह्या वृत्तपत्रात प्रकाशित झालंय.
डेन्मार्क हा स्कॅन्डेनेव्हिया मधील छोटा देश. लोकसंख्या ५८ लक्ष.
जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच डेन्मार्कमध्ये कोरोना ची लागण फेब्रुवारीच्या अखेरीस झाली परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यात लक्षणीय वाढ सुरु झाली. अर्थातच हा प्रसार बाहेरच्या देशातून आलेल्या प्रवाश्यामुळे होतं असल्याने बाहेरील कोरोनाग्रस्त देशातून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांचे अनिवार्य विलगीकरण लागू केले. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात वाढ जोरात झाल्याने सरकारने त्वरित पावले उचलली. सर्वप्रथम देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या. जर्मनी आणि स्वीडन च्या सीमा डेन्मार्कला लागून आहेत.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कोरोना टास्क फोर्स ची स्थापना करण्यात आली आणि लॉकडाउन ची घोषणा करण्यात आली. सर्वप्रथम शाळा, कॉलेजेस, सार्वजनिक संस्था, शॉपिंग मॉल्स इ. बंद केले. परंतु आवश्यक असणारी दुकाने, मेडिकल स्टोअर्स चालू ठेऊन तेथे सुरक्षित अंतर ठेवण्याचे आदेश दिले.
आवश्यक सेवा सोडल्यास सर्वाना वर्क फ्रॉम होम चे आवाहन केले. १० लोकांपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले. हवाई वाहतूक बंद केली.
सरकारने वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन जनतेला माहिती व सल्ला दिला. या पत्रकार परिषदेत स्वतः पंतप्रधान, आरोग्यमंत्री, पोलीस प्रमुख तसेच इतर अधिकारी हजर असतात व जनतेला मार्गदर्शन करतात तसेच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देतात. त्यामुळे एकप्रकारची पारदर्शकता व जनतेत विश्वास निर्माण करण्यात सरकार यशस्वी झाले.
संपुर्ण लॉकडाउन च्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध नसल्याने लोक बाहेर वॉक, जॉगिंग, सायकलिंग इ. व्यायाम प्रकार सहज पणे करू शकतात. तसेच जीवनावश्यक वस्तूंची मुबलक उपलब्धता असल्यामुळे दैनंदिन जीवन फारसे विस्कळीत झाले नाही.
अर्थातच या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाय. बऱ्याच उद्योगधंद्यांना नोकर कपात तसेच पगार कपात यासारखे उपाय करावे लागले. तसेच छोट्या उद्योगांचे बरेच नुकसान झाले. परंतु सरकार त्यांना आर्थिक मदत करत आहे. डेन्मार्कची समाजव्यवस्था हि समाज कल्याण (Social welfare) या तत्वावर आधारली आहे. त्यामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत सरकार करत असते.
सध्या परिस्थिती सुधारत असून जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सर्वप्रथम सरकारने प्राथमिक शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. या मागचे कारण असे कि एकतर लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती जास्त असते व दुसरे कारण म्हणजे मुलांचे पालक कामावर जाऊ शकतात. ऑफिसेस मध्ये कर्मचारी जाण्यास सुरवात झाली आहे. अजून जनजीवन पूर्णपणे सुरळीत होण्यास कदाचित २-३ महिन्यांचा अवधी लागेल. तोपर्यंत इतर निर्बंध कायम राहतील.
मुळातच शिस्तप्रिय समाज, कमी लोकसंख्या, कार्यक्षम सरकार व उत्तम वैद्यकीय सुविधा यामुळे सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य झाले. जनतेनेही सर्व सूचनांचे पालन करून सरकारला सहाय्य केले.